एक अज्ञात थोरपण

१०-१० दिस अन्नपाणी शिवाय राहतो,तर महिना महिना भर एकाच झाडावर दबा धरुन बसतो…!
धावायला लागला तर वाऱ्याच्या कानफाटीत मारल्यासारखे धावतो,पुराच्या डोहात खुशाल उडी मारतो..!
तलवार, भाला, फरीगगदा, पट्टा, विट्टा, धनुष्य असे काही चालवतो की समोर महासागर येऊदे शत्रूचा. शत्रूच्या राणीवशात जाऊन राहू शकतो, तर खुद्द औरंगाजेबाच्या दरबारात जाऊन त्यालाच कव्वाली ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकतो.
माणूस म्हणाल तर एकही माणसाचा गुण नाही, जनावर म्हणाल तर दिसतो माणसासारखा. मोठमोठ्या गोष्टीत अचूक निर्णय, सावध नियोजन आणि स्वतःच्याच देखरेखीखाली प्रत्यक्ष घोडदौड. खरं सांगतो हा बहिर्जी नाईक जणू शिवरायांचा तिसरा डोळाच होता.
आणि शिवराय त्याला इतके मानतात की महाराजांच्या राणीवशात एकमेव जिजाऊ माँसाहेब सोडून कोणी विना परवाना जाऊ शकत असतील ते म्हणजे बहिर्जी नाईक.
मित्रांनो, महाराजांचा नाईकांच्यावर इतका विश्वास की हा माणूस चुकून सुद्धा चूक करु शकणार नाही इतका दृढ विश्वास.
पाची पातशाहींना रणांगणात चारी मुंडी चित करुन जेव्हा महाराज राज्याभिषिक्त झाले तेव्हा सुद्धा बहिर्जी नाईक समोर येऊ शकत नव्हते इतकी गुप्तता पाळत होते नाईक.
महाराजांचा अभिषेक सुरु होता, महाराज मुक्त हस्ताने गरीब फकिराना ओंजळ भरभरून द्रव्य दान करत होते आणि एक म्हातारा फकीर त्या रांगेत उभा होता. जक्ख म्हातारा हुंदके देऊन रडत होता आणि डोळे भरून महाराजांना पाहत होता. महाराजांनी जेव्हा त्या फकिरला पाहिले तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
ओठावर मिशा नव्हत्या तेव्हा पासून या बहिर्जी आणि मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि आज मराठेशाही स्थापन होत आहे, राज्य आनंदात आहे आणि ज्याने आजवर सारी संकटे आपल्या छातीवर झेलली तो बहिर्जी फकीर होऊन याचकांच्या रांगेत उभा आहे. काय बोलावे या प्रकाराला.? कसली वेडी माणसं असतील ती.
एका मंदिराला फरशी दान दिली की साऱ्या घराण्याची नावे टाकणारे तुम्ही आम्ही त्या बहिर्जी नाईकांच्या काळजाला कधी समजू शकू का ?
स्वतःच्या बायकोला सुद्धा अगदी शेवटपर्यंत माहिती नव्हते की ज्याच्यासोबत मी सात जन्माचे बंधन बांधले आहे. तो खुद्द स्वराज्याच्या गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक आहे. इतकी कमालीची गुप्तता आणि एवढा विलक्षण त्याग करुन राजे त्यांना देत तर काय होते ?
काहीच नाही. उलट प्रत्येक मोहिमेत जीवाचा प्रश्न. माघारी येईल का नाही शाश्वती नव्हती. ही वेडी खुळी माणसे अशी का जगली असतील ?
बस्स ! एवढ्या एका प्रश्नाचे उत्तर ज्याला समजून येईल त्याच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नव्हते.
जय जिजाऊ , जय शिवराय ,जय शंभुराजे




Leave a comment